विदर्भातील गरीबांना सरकारी शुल्कात मिळणार रेमडेसिवीर! नितीन गडकरींची मोठी घोषणा; वर्ध्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही

वर्धा : येथे रेमडीसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकाड्ढयांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी पुरविले जाईल. पण, वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता ना. नितीन गडकरी वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी उत्पादनाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. वर्ध्यात उत्पादन सुरु करण्याकरिता खुप प्रयत्न करावे लागले. पण, महाराष्ट्रातील अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगीकरिता सहकार्य केले. तसेच हैद्राबादच्या एका कंपनीने सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यास मदत केली. त्यामुळेच कमी कालावधीत भारत सरकारची परवानगी मिळणारी जेनेटीक लाईफ सायन्सेस ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांची उपस्थिती होती.

वर्ध्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही

भिलाईवरून येणारे ट्रक येथे आणण्या बद्दलच्या सूचना दिल्या आहेत. २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला स्टोअर करण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे २०-२० टन क्षमतेचे आॅक्सिजन प्रकल्प लवकरच उभे करण्यासाठी प्रयत्न करणार. सिलिंडरही वाढवू, पाहिजे तेवढे व्हेंटिलेटरही उपलब्ध करुन देऊन पण, त्याचा योग्य वापर व्हावा. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही मानसाचा आॅक्सिजन, औषधीविना मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही ना.गडकरी यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here