
सेलू : स्वस्त धान्य दुकानांत मासिक धान्यवाटप सुरू झाले की, तांदूळ खरेदी करण्यासाठी वाहने गावात दाखल होतात. आता तांदूळ द्या अन् लागणारा किराणा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानांतून तांदूळ, गहू शिधापत्रिकेवर दिले जातात. पण, तीन रुपये किलो तांदूळ मिळत असून हा तांदूळ शिषधापत्रिकाधारकांना जास्तीचा होतो आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या गावात तांदूळ घेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. तांदळाच्या मोबदल्यात आता साखर, ज्वारी, बाजरी दिली जात आहे. एका दिवशी चार ते पाच तांदूळ खरेदी करणारे गावात येत असून तांदूळ द्या अन् ज्वारी घ्या, असे म्हणणारे आता तांदळाच्या बदल्यात ज्वारी, बाजरी, साखर व उच्च दर्जाचे
तांदूळ देत आहेत. १० किलो तांदळाच्या बदल्यात ५ किलो बाजरी किंवा 3 किलो साखर तसेच ५ किलो ज्वारी दिली जात आहे. या आमिषाला ग्राहक बळी पडत असून रेशनच्या तांदळाच्या किमतीत उच्च दर्जाचे तांदूळ १० किलोला पाच किलो दिले जात आहेत.
चौकाचौकांत ही वाहने उभी राहत असून गावात दवंडी देऊन खुलेआम रेशनचा तांदूळ खरेदी करत आहेत. १२ रुपये किलोप्रमाणे हा तांदूळ खरेदी करून नगद रक्कम दिली जाते. मात्र, याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. खरोखरच शिधापत्रिकेवर दिला जाणारा तांदूळ आवश्यक आहे का, असा प्रश्न आहे.