

वर्धा : येळाकेळी ते सुकळी दरम्यान सोमवारी सकाळी भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. देवळी येथून तामसवाडा गावाकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहन उलटले आणि अपघात घडला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळी येथून चार व्यक्ती तामसवाडा गावाकडे जात होत्या. वर्धा-आर्वी मार्गावरील येळाकेळी व सुकळी दरम्यान वाहनाचा मागील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास सावंगी (मेघे) पोलिस करीत आहेत.