पत्रकारांनी संवादी अन् तंत्रस्नेही व्हावे! श्रीपाद अपराजित, श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळा

वर्धा : इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे वलय आहे. दहापैकी नऊ प्रादेशिक भाषा आघाडीवर आहेत. इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे साप्ताहिक काढले होते. यात मराठीचे वर्गणीदार झाले पाहिजे, असे म्हटले आहे. हे वर्गणीदार आधी पत्रकारांनी व्हावे. तंत्रज्ञान स्नेही व्हावे आणि व्यसनापासून दूर रहावे, यासोबत पत्रकारांनी मनापासून संवादी व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) श्रीपाद अपराजित यांनी येथे केले.

वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी, 29 रोजी स्थानिक दादाजी धुनिवाले मठ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) प्रमोद काळबांडे, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, नाट्य – सिने दिग्दर्शक हरीश इथापे, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, ज्येष्ठ समासेवक सुनील बुरांडे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीपाद अपराजित पुढे म्हणाले की, ग्रामीण पत्रकारांच्या धैर्यशीलतेमुळेच पत्रकारिता जीवंत आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून सामाजिक कार्यात भाग घ्यावा. समाजभाव हा महत्त्वाचा विषय आहे. सामाजिक व्यथा, अवतीभवतीच्या वेदना पत्रकारांनी लेखनीतून मांडाव्या. पत्रकारिता असाईनमेंटचा भाग झाली असून, पत्रकाराचे गुणांकन इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मोजले जात आहे. माणूस मंगळावर गेला असला तरी शेजार्‍यांपर्यंत पोहोचू शकला नाही. पत्रकारांनी विवेक जपण्याचं काम करावे. भाषणाचे व्याकरण चुकले तरी चालेल मात्र, माणसाचे आचरण चुकता कामा नये, असेही ते म्हणाले. येत्या काळात पत्रकारांपुढे ‘एआय’चा मोठा धोका निर्माण झाला आहे. एआयने पत्रकारांवर हातोडा मारला असून, पुढच्या काळात हे तंत्रज्ञान पत्रकारांचा बळी घेईल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. नवपत्रकारांमध्ये व्यसनाचे प्रमाण कमी होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यासोबत पत्रकारांनी व्यायामाकडे म्हणजे स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांनी चांगले काय आणि वाईट काय यासाठी विवेक जागृत ठेवावा. पत्रकारांवर बंधन टाकता येत नाहीत. मात्र, पत्रकारांनी अंर्तमनातून विचार करावा. समाजभान ठेवावे आणि स्वभान ठेवावे, असे सांगनाच समाजमाध्यमांचा मोठा धोका पोहोचत असल्याचे सांगून विना गेटकिपरचा सिनेमा म्हणजे समाजमाध्यम असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकारांनी जाणीव आणि सहवेदना ठेवून पत्रकारिता करण्याचे आवाहन श्रीपाद अपराजित यांनी केले.

प्रमोद काळबांडे यांनी सामाजिक पत्रकारितेवर भाष्य केले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील फोटो जर्नलिस्ट केविन कार्टर यांचे उदाहरण देत पत्रकारिता करीत असताना आपणही समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, असा चंग बांधला पाहिजे, असे आवाहन केले. वर्धा जिल्ह्यातील अनेक पारधी बेड्यांसह विविध भटक्या – विमुक्त समाज वस्त्यात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या प्रकर्षाने वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडल्याचा थरारक पत्रकारितेतील अनुभवपट मांडला. यावेळी त्यांनी आपण सहकाऱ्यांच्या मदतीने अशा वंचित घटकांसाठी 52 शाळा सुरू केल्याचेही नम्रपणे नमूद केले. आज अशा दुर्लक्षित लोकांची महाराष्ट्रात पावणेदोन कोटी तर संपूर्ण देशभरात 20 कोटींवर संख्या आहे. पत्रकारांनी भटके, अनुसूचित जाती-जमाती, पारधी, भाट, शोषित, पीडित यांच्या प्रश्‍नांवर लिखाण केले पाहिजे. आज सोशल मीडियासारखं माध्यम आपल्याजवळ असताना चाकूने गळा कापायचा की भाजी, हे आपण ठरवावे, असेही काळबांडे म्हणाले.

यावेळी पत्रकार प्रशांत देशमुख यांनी बदलती पत्रकारिता आणि आव्हाने यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. राजेंद्र मुंढे यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेले वर्धा हे पत्रकारांसाठी पोषक वातावरण निर्माण करून देणारे स्थळ असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी केले. संचालन आनंद इंगोले यांनी केले. प्रफुल्ल व्यास यांनी आभार मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here