

वर्धा : शेतशिवारातून कामे आटोपून गावाकडे परत येत असलेल्या तीन महिलांच्या अंगावरुन बैलबंडी गेल्याने एक महिला ठार झाली. तर, दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना अल्लीपूर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मनीषा गजानन भुसारी (४०) रा. अल्लीपूर असे मृत महिलेचे नाव असून कालिंदा गवळी (५४) व माया बंडू नागतोडे (४५) दोघीही रा. अल्लीपूर अशी जखमी महिलांची नावे आहेत. या तिन्ही महिला शेतातील कामे आटोपून पायदळ गावाकडे येत होत्या, यादरम्यान त्यांच्या मागाहून रमेश साखरकर हे शेतकरी बंडीबैल घेऊन गावाकडेच येत होते. अचानक बंडीचे बैल बुजाडल्याने ते बंडी घेऊन पायदळ जात असलेल्या महिलांचा अंगावर गेले. यात या तिन्ही महिलांना गंभीर दुखापत झाल्याने गावकऱ्यांनी धाव घेत या तिन्ही महिलांना प्राथमिक अरोग्य केंद्रात दाखल केले. तोपर्यंत मनीषा भुसारी या मृत झाल्या होत्या. कालिंदा आणि माया या दोघींची प्रकृतीही गंभीर असल्याने त्यांना वर्ध्यात पुढील उपचारासाठी पाठविले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार प्रफुल्ल डाहुले करीत आहेत.