

हिंगणघाट : तालुक्यातील सावली (वाघ) येथे गॅस सिलिंडरचा भडका उडून लागलेल्या आगीत कष्टकऱ्यांच्या पाच झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला.
गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर पळ काढला. पण, अचानक आगीचा भडका उडाल्याने बघताबघता पाच झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. दरम्यान, हिंगणघाट येथील अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.