आघाडीत तणाव
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात कोरोनामुळे वातावरण धुमसत असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विधान परिषदेसाठी दिल्लीतून काँग्रेसने एका उमेदवाराची घोषणा केली. त्याबाबतचं पत्र दिल्लीतून येताच शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. मात्र काही तासांमध्येच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस दोन जागा लढवत असल्याचं जाहीर केलं आणि उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसने दोन उमेदवार उभे न करता एक उमेदवार द्यावा आणि निवडणुक बिनविरोध व्हावी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे.तशा प्रकारचा निरोप मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसकडे पोहोचवला आहे. मात्र काँग्रेस दोन उमेदवारांवर ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
शिवसेनेने हवे असल्यास एक उमेदवार द्यावा असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस आक्रमक असून दोन उमेदवारांवर ठाम आहे. राज्यातल्या नेत्यांना दिल्लीतून तशा प्रकारच्या सूचना आल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करणार असून त्यातून मार्ग निघेल असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं.